महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Showing posts with label निळकंठ प्रत. Show all posts
Showing posts with label निळकंठ प्रत. Show all posts

Monday, April 12, 2021

महाभारताचे शुद्धीकरण व BORI

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ?

महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट करून सोडलेलं आहे या उक्तीचा प्रत्यय येतो. आणि मग यदि हास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित ( यात जे आहे ते जगात सर्वत्र आहे मात्र यात जे नाही ते जगात कुठेच सापडावयाचे नाही)  हेदेखील समजते. असं काय विशेष आहे यात ? कसं बनले हे इतकं सर्वसमावेशक ?


महाभारत हा इतिहास असल्याचं खुद्द व्यासांनीच सांगून ठेवलंय. हा इतिहास घडला कधी असावा,  हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. व्यासांनी हे महाभारत सर्व प्रथम त्यांच्या सुमंतू , जैमिनी, पैल , शुक (व्यासपुत्र) व वैशंपायन या ५ शिष्याना सांगितले. व्यासांनी सांगितलेला या इतिहासात वेळोवेळी भर पडत गेली व एक अवाढव्य महाकाव्य घडत गेलं.  ही हस्तलिखिते तयार होताना / झाल्यावर, त्याचा प्रसार भारताच्या इतर भागांमध्ये व भाषांमध्ये होत गेला.  त्यातील कथाकाव्य देखील लोकांना भावले व प्रतिभावंतांनी त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरले. यात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रांतांचे , कवींचे , शासकांचे संस्कार घडत गेले व ते इतके बेमालूम होते कि यातील मूळ गाभा कोणता व वर चढवलेला साज कोणता हे समजणं  कठीण होऊन बसलं. हि  अनावश्यक भर म्हणजेच प्रक्षिप्तता.  मूळ संहिता वाढत वाढत लक्ष श्लोकांवर पोहोचली आणि यातील गाभा वेगळा करण्याचं काम शिवधनुष्य पेलण्याएवढं कठीण होऊन बसलं. 

भांडारकर संस्थेची संशोधित प्रत 
संशोधित प्रत (Critical Edition) म्हणजे महाभारताच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून बनविलेली तौलनिक प्रत.  एक अशी प्रत की जी कालौघात बरीच मागे जाईल व अनेकविध प्रकारांनी महाभारतात पडलेली अनावश्यक भर दूर करेल.  यापूर्वी आपल्याला उपलब्ध असलेली शेवटची सर्व समावेशक प्रत, छत्रपतींच्या शिवरायांना समकालीन असलेल्या सतराव्या शतकातील निळकंठ याची होती.  निळकंठ चतुर्धर या महाराष्ट्रीय संस्कृत पंडिताने भारतातल्या बऱ्याच प्रतींचा अभ्यास करून, स्वतःच्या संस्कृत टिपणांसह ही सर्वसमावेशक प्रत काशी(वाराणशी) येथे  बनविली. 

भांडारकर इन्स्टिट्यूट मे १९२० च्या सुमारास संशोधित प्रत बनविण्याचे काम हाती घेतले. औंध संस्थानाचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्या काळी या प्रकल्पासाठी सुमारे एक लक्ष रुपयांची मदत केली होती.डॉक्टर विष्णू सुखटणकर १९२५ च्या सुमारास आपली डॉक्टरेट पूर्ण करून भारतात परतले आणि त्यांनी या कामात आपल्याला झोकून दिले.  त्यासाठी त्यांनी भारतभर विखुरलेल्या विविध भाषातील महाभारताच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करायचे ठरविले.  यात काही प्रतींमध्ये फक्त काही पर्वेच सापडली (त्यात संपूर्ण अठरा पर्वे नव्हती).  सुखटणकर यांच्या या पद्धतशीर अभ्यासाचा हेतू हा होता की महाभारताची जास्तीत जास्त जुनी प्रत प्रसिद्ध करणे. म्हणजे असे करताना त्यात भरीला घातले गेलेले चमत्कार, रूपके  इत्यादी आपोआपच गळून पडतील.  

महाभारताची विविध हस्तलिखिते केवळ देशाच्या विविध भागातच  नाही तर नेपाळ, जावा अशी भारताबाहेर देखील आढळली.  भांडारकर संस्थेने अशी देशाच्या अनेक भागात  विखुरलेली हस्तलिखिते एकत्र केली. त्यांचा अभ्यास करून जुन्यात जुन्या प्रतीत एखाद्या पर्वात कोणते श्लोक होते व कोणते नव्हते ते पाहिले,  व त्यातून भांडारकर संस्थेची एक प्रत प्रसिद्ध केली. १९४३ च्या सुमारास डॉ सुखटणकरांचे निधन झाले त्यांच्यानंतरही सुमारे २३ वर्षे, त्यांचे सहकारी श्री दांडेकर, श्री बेलवलकर , पा.वा.काणे , गजेंद्रगडकर, व्ही.के.राजवाडे, उटगीरकर  यांनी हे काम सुरु ठेवले व ते १९६६ च्या सुमारास पूर्ण केले. आज अभ्यासकांमध्ये भांडारकर संस्थेची (BORI) हीच प्रत प्रमाण मानली जाते. अशा प्रकारे तयार केलेली ही प्रत आपल्याला इसवी सन १००० च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या महाभारतीय काव्याच्या जवळ घेऊन जाते. म्हणजेच निळकंठ यांच्याही सुमारे सहाशे ते सातशे वर्षे आधी. पण अर्थातच हि प्रत म्हणजेच खरे महाभारत असे आपल्याला अजूनही म्हणता येत नाही

भृगु सिद्धांत
डॉक्टर सुखटणकर यांना विविध हस्तलिखितांचा अभ्यास करताना असे लक्षात आले की हे काव्य इसवी सनाच्या उत्तर काळात कधीतरी भृगु कुलातील ऋषींच्या हाती गेलेले आहे व त्यांनीच आपल्या कुलाचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यात बरीच भर घातलेली आहे. त्यामुळेच यात ब्राह्मणी गुणगानाची बरीच भर आढळते. 

महाभारतातील प्रक्षेप मानल्या गेलेल्या काही घटना 
यातील सर्वात सुरुवातीचा प्रक्षेप आहे तो गणेश कथेचा,  ज्यात व्यासांनी सांगितलेले महाभारत काही अटींवर श्रीगणेशाने लिहिले  हा.  व्यासमहर्षीच्या काळात कोणतीही लिपी अस्तित्वात नव्हती व त्यामुळे भर होता तोच स्मृतींवर.   महाभारत कथा शतकानुशतके स्मृतींवर पुढे सरकली व जेव्हा कधी लिपीची निर्मिती झाली त्यावेळी ते हस्तलिखितात उतरवले गेले.  त्यातही संस्कृत केवळ देवनागरी लिपीतच लिहिले गेले असे मानण्याचे काहीच कारण नाही.  कारण देवनागरी लिपी ही साधारणपणे इसवी सन एक हजार च्या आसपास सुस्थितीला पोहोचली असावी असे मानण्यात येते. 

आता आपण अशा काही घटना पाहू कि ज्या खूप प्रसिद्ध आहेत पण भांडारकर प्रतीने त्यांना उत्तरकालीन प्रक्षेप ठरविले आहे. यात मुख्यत्वेकरून 
  • कणिक नावाच्या मंत्र्याने लाक्षागृह प्रसंगी धृतराष्ट्राला सांगितलेली कणिक नीती ,
  • द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाला सूतपुत्र म्हणाल्याचा उल्लेख
  • द्रौपदीला वस्रहरणाच्या वेळी कृष्णाने वस्त्रे पुरविल्याची घटना , 
  • द्रौपदीला सूर्याने थाळी दिली व त्यामुळे दुर्वास तिचे सत्वहरण करू शकले नाहीत हि घटना, 
 या काही घटना येतात. इतर अशा घटना आपण याच ब्लॉगवर पुढे सविस्तर पाहूच. 

सुखटणकरांची पद्धत 
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट (BORI) या संस्थेने भारतातील सर्व भाषांतील हस्तलिखिते व मुद्रित प्रति मिळविल्या. यात उत्तरेकडील काश्मीर भागातील शारदा लिपीतील व याच भागातील (काश्मीर व उत्तरेकडील) देवनागरी हस्तलिखितांचा देखील  समावेश होतो. मध्य पूर्वेकडील भागातून (गंगा यमुना प्रदेश) नेपाळी, मैथिली व बंगाली भाषेतील प्रतीचा एक वेगळा गट तयार केला . दक्षिणेकडील तेलगू + ग्रंथ लिपीतील हस्तलिखिते व मल्याळम हस्तलिखिते हि दक्षिण गटात मोडतात. सुखटणकरांनी केलेली वर्गवारी सोबतच्या तक्त्यात दाखविली आहे. हि वर्गवारी ग्रीक अक्षरांनी दर्शविली जाते. 

(१) अशी १२ लिप्यांमधील सुमारे १२५९ हस्तलिखिते त्यांनी जमविली पण प्रत्यक्षात अभ्यासाअंती केवळ ७३४ हस्तलिखितं वापरता आली. 
(२) यात एकाच पर्वाच्या पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्यांमध्ये त्याचा अंतर्भाव असेल तर तो श्लोक संशोधित आवृत्तीत घेतला गेला. 
(३) काही न पटणाऱ्या (चमत्कार, वर, शापांशी निगडित असूनदेखील) गोष्टी जर सर्व मूळ आवृत्त्यांमध्ये सापडत असतील आत त्या संशोधित आवृत्तीत देखील राखल्या गेल्या. यात पांडूच्या निधनानंतरच्या वर्णनाचे उदाहरण देता येईल. यात त्याचे वनात दहन केले असे उल्लेख आहेत व त्याचबरोबर पांडू व माद्रीचे शव हस्तिनापुरात आणून तेथे दहनसंस्कार झाले असेही उल्लेख आढळतात व हे दोन्हीही परस्परविरोधी उल्लेख संशोधित आवृत्तीत ठेवले गेलेले आहेत. 
(४) जेव्हा आवृत्त्यांमध्ये वर्णनाचे फरक आढळले तेव्हा जास्तीत जास्त आवृत्त्यांमध्ये आढळले गेलेले वर्णन संशोधित आवृत्तीत ठेवले गेले. 
(५) वर्णनाची भर असलेले श्लोक, समागमाचे वर्णन वगळण्यासाठी तयार केलेले पर्यायी श्लोक यांचा योग्य तो विचार करून त्यातील मुख्य तथ्यांश शोधून तो संशोधित आवृत्तीत राखला गेला. 

काश्मीरमधील शारदा लिपीतील भूर्जपत्रांवरील हस्तलिखितांचा या कमी बराच उपयोग झाला.य. मुख्य म्हणजे यातील एका श्लोकात आदिपर्वातील श्लोकसंख्येचे वर्णन करणारा एक श्लोक आढळला ज्यातील श्लोकसंख्या (७९८४) संशोधित आवृत्तीने काढलेल्या श्लोकसंख्येशी तंतोतंत जुळली , तो श्लोक असा 

सप्त श्लोकसहस्त्राणि तथा नव शतानिच  ।
श्लोकाश्च चतुराशीति ग्रंथो दृब्द्धो  महात्मना ।।

यातील फक्त आदिपर्वातील एकूण श्लोकसंख्या ७९८४ एवढी सांगितली आहे तर निळकंठ प्रतीत ती ८८८४, कुंभकोणम (दक्षिण) प्रतीत १०८८९ एवढी होती. 

या सर्व अभ्यासासाठी BORI ला क्षेमेंद्र च्या भारतमंजिरी, देवबोध यांच्या ज्ञानदीपिका , अर्जुनमिश्र यांच्या भारतसंग्रहदीपिका , निळकंठ यांच्या भावार्थदीपिका, तसेच विमलबोध व सर्वज्ञ नारायण यांच्या ग्रंथ टिपांचाही बराच उपयोग झाला. 

BORI चे हे कार्य खरोखरच अवजड शिवधनुष्य पेलणारे महान कार्य होते व ते वर उल्लेखलेल्या संशोधकांबरोबरच तर अनेक संशोधकांनी ४ दशकांहून अधिक काळ अपार परिश्रम घेत पार पाडले. 

Wednesday, March 10, 2021

महाभारताच्या चोखंदळ वाचकांसाठी संदर्भ व विश्लेषण ग्रंथ

 प्रत्येक मराठी घरात रामायण-महाभारत यासारखे धर्मग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रथम हस्तांतरित होतात  होतात ते मौखिक स्वरूपात.  आमच्या लहानपणी तरी तशीच परिस्थिती होती व त्यामुळे त्यातील अद्भुताचे मलाही  एक कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा देखील.  महाभारतासारखा  प्रचंड ग्रंथ तर अनेक अद्भुतांनी भरलेला.  प्रथम त्यातील लहानसहान गोष्टी वाचल्या. त्यानंतर पांडवप्रताप, महाभारत कथासार व त्यापुढे जैमिनी अश्वमेध कथासार अशा छोट्या पुस्तकातून महाभारताचा एक सलग कथा भाग माझ्या मनात साकार झाला. त्याही पुढे जाऊन मृत्युंजय, युगंधर, राधेय यांच्यासारख्या ललित कादंबऱ्या वाचल्या व त्यातील कर्ण, कृष्ण यांच्या रेखाटनाने  तर मी भारावूनच गेलो होतो. 

१९६६ च्या सुमारास पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने (BORI)  महाभारतावर काही दशकं संशोधन करीत महाभारताची चोखंदळ अथवा संशोधित आवृत्ती (ज्याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल एडिशन CE , म्हणून ओळखलं जातं)  प्रसिद्ध केली होती. मूळ महाभारतात नसलेले आणि नंतर घुसडले गेले असावेत असे वाटणारे -  सर्व श्लोक त्यांनी बाजूला काढले व महाभारताच्या तत्कालीन अभ्यासकांना महाभारताच्या अभ्यासासाठी एक नवं दालन उपलब्ध झालं. असं करताना BORI च्या अभ्यासकांनी भारताच्या विविध भागात उपलब्ध असणाऱ्या महाभारताच्या विविध प्रतींचा सुमारे चाळीसएक वर्ष अभ्यास केला व त्यामुळे या संदर्भ ग्रंथाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या  संदर्भ ग्रंथांच्या आधी, बर्‍याच जणांनी महाभारताच्या निळकंठ प्रतीला प्रमाण मानलं होतं. ही प्रत म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरी तीरावरील कोपरगाव या ठिकाणच्या, निळकंठ चतुर्धर, या संस्कृत अभ्यासकांने  महाभारतावर केलेलं सतराव्या शतकातील विवेचन.  सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी जन्मलेले हे कवीवर्य  पुढे संस्कृतच्या अभ्यासासाठी वाराणसीत स्थायिक झाले येथूनच त्यांनी महाभारतावरील हे संस्कृत टिपण लिहिलं.  बऱ्याच संस्कृत अभ्यासकांकडून ते आजही प्रमाण मानले जाते. 

याबद्दल एक विशेष सांगायचे म्हणजे निळकंठ यांची ही प्रत सतराव्या शतकातील असल्याने यातील युध्दवर्णनात  युद्धांच्या उल्लेख तोफांचे उल्लेख देखील आहेत.  याचा उपयोग महाभारतकाळी देखील तोफा होत्या असे सांगायला आज केला जातो तो पूर्णतः  चुकीचा आहे.  

भांडारकर प्रत उपलब्ध झाल्यावर मराठीत देखील अनेक साहित्य कृतींना बहर आला. यात मृत्युंजय, राधेय, युगंधर सारख्या ललित कादंबरी वजा लिखाण होते तसेच युगांत, व्यासपर्व, हा जय नावाचा इतिहास आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, महाभारत एक सूडाचा प्रवास असे विश्लेषणात्मक वृत्तपत्रीय लेखन संकलन अथवा पुस्तके देखील होती. कर्ण व श्रीकृष्ण या व्यक्तिरेखाना त्यामुळे बराच उठाव मिळाला. कर्णावर तर मृत्युंजय, तो राजहंस एक अशी मराठी नाटकं  देखील निघाली होती जी मी देखील त्याकाळी पाहिली होती. 

१९७० व १९८०च्या सुमारास वृत्तपत्रातून महाभारतावर बरेच लेख-प्रति लेख छापून येत. त्यातून यातली बरीचशी पुस्तकं संकलित केली गेली आणि म्हणूनच त्याचे साहित्यिक मूल्य देखील फार आहे.  या टीकात्मक व विश्लेषणात्मक लेख आणि पुस्तकांबरोबरच महाभारताचे एक मानवी स्वरूप देखील उलगडायला सुरुवात झाली व त्यातील प्रत्येक चमत्कृतीपूर्ण व अनाकलनीय प्रसंगावर सांगोपांग विचार व चर्चा सुरू झाली. यातूनच श्री एस एल भैरप्पा यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून १९८०च्या सुमारास पर्व ही कादंबरी साकारली आणि महाभारताचा एक वेगळाच मानवी पैलू लोकांच्या ध्यानात आला व हळूहळू वाचकांच्या पचनी पडू लागला.

माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक मात्र यापासून बराच दूर होता. मी शालेय जीवनात युगंधर, मृत्युंजय सारखे ललित कादंबरी प्रकारात मोडणारे वाङ्मय वाचले होते. परंतु या टीकात्मक अथवा विश्लेषणात्मक लेख व पुस्तकांपासून मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो व म्हणूनच माझ्या पिढीच्या अनेकांप्रमाणे मलादेखील बी. आर. चोप्रा यांचे दूरदर्शनवरील महाभारत हेच संपूर्ण महाभारत होते. अभ्यासाच्या व नंतरच्या नोकरीच्या व्यस्ततेत महाभारत हा विषय मागे पडला आणि मधल्या कालावधीत केवळ ज्ञानरंजन म्हणून अधून मधून जमेल तसे वाचत राहिलो.

पण सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये माझ्या नोकरीच्या अखेरच्या काळात  श्री. एस. एल. भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती वाचताच मी भारावून गेलो. पर्व मधील घटना मनाला पटू लागल्या.  चमत्कारांवरील   दैवी आवरण बाजूला होऊ लागले. त्या मागचा मानवी चेहरा जास्त जवळचा वाटू लागला आणि  मग कुठेतरी मनाच्या मागच्या कोपऱ्यातील अडगळीतून असलेल्या युगांत, व्यासपर्व, महाभारत एक सूडाचा प्रवास,  महाभारत-संघर्ष आणि समन्वय, अशा अनेक पुस्तकांचा शोध सुरू झाला आणि हळूहळू ती वाचताना महाभारता बद्दलची उत्सुकता नव्याने जागृत झाली. त्यातील घटनांना नवे आयाम मिळाले.नवीन दृष्टीकोन मिळाला.  एकदम काहीतरी नवीन वेगळं गवसल्याचा आनंद मिळाला.  मग हे सगळं सांगायचं कुणाला? कळणार कोणाला? आणि कधी? हेच समजेना म्हणून हा ब्लॉग लेखन प्रपंच.

आता ही सर्व पुस्तक दोन-दोनदा वाचल्यावर डॉक्टर रा. शं. वाळिंबे संपादित विदर्भ-मराठवाडा कंपनीचे सर्व खंड नव्याने वाचायला घेतले आहेत.  संदर्भासाठी गीता प्रेस, गोरखपुर यांची संस्कृत हिंदी आवृत्ती व भांडारकर इन्स्टिट्यूटची संस्कृतमधील संशोधित प्रत देखील आहे. या सर्वांचा वापर करून हळूहळू मला उमगलेले महाभारत मराठीतून उलगडण्याचा विचार आहे. तसं पाहिलं तर, ते इतर बऱ्याच ब्लॉगवर पण उपलब्ध आहे तरी पण मला त्याचे अस्तित्व पुर्ण वाटत नसल्याने, माझ्या दृष्टीकोनातून ते सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. अर्थात यासाठी बराच कालावधी लागेल याचीही मला जाणीव आहे तरीपण पाहुया किती तग  धरता येतो ते.


मला उपलब्ध झालेले काही साहित्य (गीता प्रेस व भांडारकर प्रती) नेटवर उपलब्ध आहे. यथावकाश मी ते माझ्या या ब्लॉग वर पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेनच पण त्याआधी त्याचे माझ्या दृष्टिकोनातून परीक्षण देखील वेगळ्या लेखात करेन. आजमितीस खालील पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत. 

  1. महाभारत संशोधीत आवृत्ती - भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट - खास संस्कृत जाणकारांसाठी  व अभ्यासकांसाठी 
  2. महाभारत - संस्कृत - हिंदी आवृत्ती - गीताप्रेस - संस्कृत येत नसल्यामुळे येथील भाषांतराचा ताडून पाहण्यास उपयोग होतो 
  3. महाभारत - ११ खंड - संपादक डॉ रा. शं. वाळिंबे , प्रकाशक  विदर्भ मराठवाडा बुक कंपनी - यात संस्कृत श्लोक नाहीत परंतु प्रत्येकी श्लोकाचे अथवा श्लोकसमूहाचे मराठी भाषांतर आहे. मूळ संस्कृत श्लोक पाहायचा असल्यास गीता प्रेस ची आवृत्ती उपयोगी पडते.
  4. महाभारत - २ खंड - लेखिका : कमला सुब्रमण्यम , अनुवाद - मंगेश पाडगावकर - साधं सरळ गोष्टीरूप महाभारत 
  5. पर्व - एस एल भैरप्पा - मराठी भावानुवाद - सौ उमा कुलकर्णी. महाभारतावर आधारित उत्कृत्ष्ट कादंबरी (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल). 
  6. महाभारत - माधव कानिटकर (कथारूप). एक सलग कथा म्हणून थोडक्यात वाचण्यास उपयुक्त. 
  7. महाभारतातील व्यक्तिदर्शन - शं. के. पेंडसे - व्यक्तीविशेष लेखांचे संकलन, १९६४ सालचे मॉडर्न बुक डेपो यांचे प्रकाशन. महाभारतातील व्यक्तिरेखांवर मानवी दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारे एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक. महाभारतातील विविध व्यक्तिरेखांचे बारकावे अभ्यासायचे असतील तर हे पुस्तक  अभ्यासायलाच हवे,
  8. युगांत - इरावती कर्वे - व्यक्तीविशेष लेखांचे संकलन. (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल). 
  9. व्यासपर्व - दुर्गा भागवत - महाभारतातील व्यक्तीविशेष लेखांचे संकलन.
  10. जय - देवदत्त पट्टनायक - महाभारत व त्याची उपकथानक , लोकगीतं  याच्या संग्रहातून तयार होणारे  उपयुक्त संदर्भ पुस्तक 
  11. महाभारत - एक सूडाचा प्रवास - दाजी पणशीकर - महाभारतातील सूड हि मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करणारे पुस्तक. 
  12. महाभारताचे वास्तव दर्शन (आक्षेपांच्या संदर्भात) - प्रो. अनंत दामोदर आठवले (स्वामी वरदानंद भारती) - महाभारताच्या तत्कालीन लेखकांच्या पांडव विरोधी , कौरव व कर्ण धार्जिण्या लेखकांची स-संदर्भ चिरफाड करणारे पुस्तक 
  13. महाभारत - संघर्ष आणि समन्वय - रवींद्र गोडबोले , अतिशय वेगळ्या पद्धतीनं संकल्पना मांडणारे उत्कृष्ट पुस्तक 
  14. कर्ण , महापुरुष कि खलपुरुष - सौ माधवी सप्रे 
  15. कर्ण खरा कोण होता? - दाजी पणशीकर. कर्णाची काळी बाजू उजेडात आणणारे पणशीकरांचे उत्कृष्ट पुस्तक. मृत्युंजय वाचून भारलेल्यानी हे पुस्तक वाचायलाच हवे. 
  16. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे - विश्वास दांडेकर - श्रीकृष्णाच्या आयुष्याची वेगळी बाजू उलगडून दाखविणारे सुंदर पुस्तक.
  17. व्यासांचे शिल्प - नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेल्या महाभारतविषयक प्रस्तावना व लेखांचा संग्रह. एक सुंदर संकलन, महाभारताच्या अभ्यासकांनी वाचायलाच हवे असे. यातील कृष्णाविषयीचे लेख अत्यंत उत्कृष्ट आहेत. 
  18. महाभारताचा मूल्यवेध - डॉ. रवींद्र शोभणे  - महाभारतातील  व्यक्तिरेखांचा वेगळा विचार मांडणारे पुस्तक. (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल).  
  19. महाभारत - पहिला इतिहास - वि. ग. कानिटकर - सरळ साधं महाभारत, आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्व अशी सर्व १८ पर्व थोडक्या व ३८० पानांच्या या पुस्तकात बसविली आहेत.
  20. व्यासांचा वारसा - आनंद जोतेगावकर - महाभारत कथेतील बऱ्याच गोष्टी आरश्यात लक्ख पणे उलगडून दाखविणारे पण समजण्यास थोडेसे कठीण असणारे, एक सुंदर पुस्तक.
  21. यासम हा - प्रा. सदानंद मोरे  - योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चारित्र्य. कृष्णाच्या आयुष्यावर आधारित शोधनिबंध असल्याने तत्वज्ञानाची बैठक असणारे पुस्तक. वाचायला काहीसे जड.
  22. महाभारत : एक मुक्त चिंतन - प्रेमा कंटक - महाभारता वरील चिंतनात्मक स्फुट लेखन - यात महाभारत काव्याचे लेखक , त्यात अनेकांनी घातलेली भर , महाभारतातील विसंगती व असंभव घटना , दैव कि पुरुषार्थ असा विविधांगी विचार आहे. यातील सूत्रधार या प्रकरणात कृष्णाचे महाभारतातील स्थान या त्याचे जीवन यावरील चर्चा आहे. १९६७ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक महाभारत अभ्यासकांसाठी संग्राह्य आहे.