महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Monday, April 12, 2021

महाभारताचे शुद्धीकरण व BORI

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ?

महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट करून सोडलेलं आहे या उक्तीचा प्रत्यय येतो. आणि मग यदि हास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित ( यात जे आहे ते जगात सर्वत्र आहे मात्र यात जे नाही ते जगात कुठेच सापडावयाचे नाही)  हेदेखील समजते. असं काय विशेष आहे यात ? कसं बनले हे इतकं सर्वसमावेशक ?


महाभारत हा इतिहास असल्याचं खुद्द व्यासांनीच सांगून ठेवलंय. हा इतिहास घडला कधी असावा,  हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. व्यासांनी हे महाभारत सर्व प्रथम त्यांच्या सुमंतू , जैमिनी, पैल , शुक (व्यासपुत्र) व वैशंपायन या ५ शिष्याना सांगितले. व्यासांनी सांगितलेला या इतिहासात वेळोवेळी भर पडत गेली व एक अवाढव्य महाकाव्य घडत गेलं.  ही हस्तलिखिते तयार होताना / झाल्यावर, त्याचा प्रसार भारताच्या इतर भागांमध्ये व भाषांमध्ये होत गेला.  त्यातील कथाकाव्य देखील लोकांना भावले व प्रतिभावंतांनी त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरले. यात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रांतांचे , कवींचे , शासकांचे संस्कार घडत गेले व ते इतके बेमालूम होते कि यातील मूळ गाभा कोणता व वर चढवलेला साज कोणता हे समजणं  कठीण होऊन बसलं. हि  अनावश्यक भर म्हणजेच प्रक्षिप्तता.  मूळ संहिता वाढत वाढत लक्ष श्लोकांवर पोहोचली आणि यातील गाभा वेगळा करण्याचं काम शिवधनुष्य पेलण्याएवढं कठीण होऊन बसलं. 

भांडारकर संस्थेची संशोधित प्रत 
संशोधित प्रत (Critical Edition) म्हणजे महाभारताच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून बनविलेली तौलनिक प्रत.  एक अशी प्रत की जी कालौघात बरीच मागे जाईल व अनेकविध प्रकारांनी महाभारतात पडलेली अनावश्यक भर दूर करेल.  यापूर्वी आपल्याला उपलब्ध असलेली शेवटची सर्व समावेशक प्रत, छत्रपतींच्या शिवरायांना समकालीन असलेल्या सतराव्या शतकातील निळकंठ याची होती.  निळकंठ चतुर्धर या महाराष्ट्रीय संस्कृत पंडिताने भारतातल्या बऱ्याच प्रतींचा अभ्यास करून, स्वतःच्या संस्कृत टिपणांसह ही सर्वसमावेशक प्रत काशी(वाराणशी) येथे  बनविली. 

भांडारकर इन्स्टिट्यूट मे १९२० च्या सुमारास संशोधित प्रत बनविण्याचे काम हाती घेतले. औंध संस्थानाचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्या काळी या प्रकल्पासाठी सुमारे एक लक्ष रुपयांची मदत केली होती.डॉक्टर विष्णू सुखटणकर १९२५ च्या सुमारास आपली डॉक्टरेट पूर्ण करून भारतात परतले आणि त्यांनी या कामात आपल्याला झोकून दिले.  त्यासाठी त्यांनी भारतभर विखुरलेल्या विविध भाषातील महाभारताच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करायचे ठरविले.  यात काही प्रतींमध्ये फक्त काही पर्वेच सापडली (त्यात संपूर्ण अठरा पर्वे नव्हती).  सुखटणकर यांच्या या पद्धतशीर अभ्यासाचा हेतू हा होता की महाभारताची जास्तीत जास्त जुनी प्रत प्रसिद्ध करणे. म्हणजे असे करताना त्यात भरीला घातले गेलेले चमत्कार, रूपके  इत्यादी आपोआपच गळून पडतील.  

महाभारताची विविध हस्तलिखिते केवळ देशाच्या विविध भागातच  नाही तर नेपाळ, जावा अशी भारताबाहेर देखील आढळली.  भांडारकर संस्थेने अशी देशाच्या अनेक भागात  विखुरलेली हस्तलिखिते एकत्र केली. त्यांचा अभ्यास करून जुन्यात जुन्या प्रतीत एखाद्या पर्वात कोणते श्लोक होते व कोणते नव्हते ते पाहिले,  व त्यातून भांडारकर संस्थेची एक प्रत प्रसिद्ध केली. १९४३ च्या सुमारास डॉ सुखटणकरांचे निधन झाले त्यांच्यानंतरही सुमारे २३ वर्षे, त्यांचे सहकारी श्री दांडेकर, श्री बेलवलकर , पा.वा.काणे , गजेंद्रगडकर, व्ही.के.राजवाडे, उटगीरकर  यांनी हे काम सुरु ठेवले व ते १९६६ च्या सुमारास पूर्ण केले. आज अभ्यासकांमध्ये भांडारकर संस्थेची (BORI) हीच प्रत प्रमाण मानली जाते. अशा प्रकारे तयार केलेली ही प्रत आपल्याला इसवी सन १००० च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या महाभारतीय काव्याच्या जवळ घेऊन जाते. म्हणजेच निळकंठ यांच्याही सुमारे सहाशे ते सातशे वर्षे आधी. पण अर्थातच हि प्रत म्हणजेच खरे महाभारत असे आपल्याला अजूनही म्हणता येत नाही

भृगु सिद्धांत
डॉक्टर सुखटणकर यांना विविध हस्तलिखितांचा अभ्यास करताना असे लक्षात आले की हे काव्य इसवी सनाच्या उत्तर काळात कधीतरी भृगु कुलातील ऋषींच्या हाती गेलेले आहे व त्यांनीच आपल्या कुलाचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यात बरीच भर घातलेली आहे. त्यामुळेच यात ब्राह्मणी गुणगानाची बरीच भर आढळते. 

महाभारतातील प्रक्षेप मानल्या गेलेल्या काही घटना 
यातील सर्वात सुरुवातीचा प्रक्षेप आहे तो गणेश कथेचा,  ज्यात व्यासांनी सांगितलेले महाभारत काही अटींवर श्रीगणेशाने लिहिले  हा.  व्यासमहर्षीच्या काळात कोणतीही लिपी अस्तित्वात नव्हती व त्यामुळे भर होता तोच स्मृतींवर.   महाभारत कथा शतकानुशतके स्मृतींवर पुढे सरकली व जेव्हा कधी लिपीची निर्मिती झाली त्यावेळी ते हस्तलिखितात उतरवले गेले.  त्यातही संस्कृत केवळ देवनागरी लिपीतच लिहिले गेले असे मानण्याचे काहीच कारण नाही.  कारण देवनागरी लिपी ही साधारणपणे इसवी सन एक हजार च्या आसपास सुस्थितीला पोहोचली असावी असे मानण्यात येते. 

आता आपण अशा काही घटना पाहू कि ज्या खूप प्रसिद्ध आहेत पण भांडारकर प्रतीने त्यांना उत्तरकालीन प्रक्षेप ठरविले आहे. यात मुख्यत्वेकरून 
  • कणिक नावाच्या मंत्र्याने लाक्षागृह प्रसंगी धृतराष्ट्राला सांगितलेली कणिक नीती ,
  • द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाला सूतपुत्र म्हणाल्याचा उल्लेख
  • द्रौपदीला वस्रहरणाच्या वेळी कृष्णाने वस्त्रे पुरविल्याची घटना , 
  • द्रौपदीला सूर्याने थाळी दिली व त्यामुळे दुर्वास तिचे सत्वहरण करू शकले नाहीत हि घटना, 
 या काही घटना येतात. इतर अशा घटना आपण याच ब्लॉगवर पुढे सविस्तर पाहूच. 

सुखटणकरांची पद्धत 
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट (BORI) या संस्थेने भारतातील सर्व भाषांतील हस्तलिखिते व मुद्रित प्रति मिळविल्या. यात उत्तरेकडील काश्मीर भागातील शारदा लिपीतील व याच भागातील (काश्मीर व उत्तरेकडील) देवनागरी हस्तलिखितांचा देखील  समावेश होतो. मध्य पूर्वेकडील भागातून (गंगा यमुना प्रदेश) नेपाळी, मैथिली व बंगाली भाषेतील प्रतीचा एक वेगळा गट तयार केला . दक्षिणेकडील तेलगू + ग्रंथ लिपीतील हस्तलिखिते व मल्याळम हस्तलिखिते हि दक्षिण गटात मोडतात. सुखटणकरांनी केलेली वर्गवारी सोबतच्या तक्त्यात दाखविली आहे. हि वर्गवारी ग्रीक अक्षरांनी दर्शविली जाते. 

(१) अशी १२ लिप्यांमधील सुमारे १२५९ हस्तलिखिते त्यांनी जमविली पण प्रत्यक्षात अभ्यासाअंती केवळ ७३४ हस्तलिखितं वापरता आली. 
(२) यात एकाच पर्वाच्या पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्यांमध्ये त्याचा अंतर्भाव असेल तर तो श्लोक संशोधित आवृत्तीत घेतला गेला. 
(३) काही न पटणाऱ्या (चमत्कार, वर, शापांशी निगडित असूनदेखील) गोष्टी जर सर्व मूळ आवृत्त्यांमध्ये सापडत असतील आत त्या संशोधित आवृत्तीत देखील राखल्या गेल्या. यात पांडूच्या निधनानंतरच्या वर्णनाचे उदाहरण देता येईल. यात त्याचे वनात दहन केले असे उल्लेख आहेत व त्याचबरोबर पांडू व माद्रीचे शव हस्तिनापुरात आणून तेथे दहनसंस्कार झाले असेही उल्लेख आढळतात व हे दोन्हीही परस्परविरोधी उल्लेख संशोधित आवृत्तीत ठेवले गेलेले आहेत. 
(४) जेव्हा आवृत्त्यांमध्ये वर्णनाचे फरक आढळले तेव्हा जास्तीत जास्त आवृत्त्यांमध्ये आढळले गेलेले वर्णन संशोधित आवृत्तीत ठेवले गेले. 
(५) वर्णनाची भर असलेले श्लोक, समागमाचे वर्णन वगळण्यासाठी तयार केलेले पर्यायी श्लोक यांचा योग्य तो विचार करून त्यातील मुख्य तथ्यांश शोधून तो संशोधित आवृत्तीत राखला गेला. 

काश्मीरमधील शारदा लिपीतील भूर्जपत्रांवरील हस्तलिखितांचा या कमी बराच उपयोग झाला.य. मुख्य म्हणजे यातील एका श्लोकात आदिपर्वातील श्लोकसंख्येचे वर्णन करणारा एक श्लोक आढळला ज्यातील श्लोकसंख्या (७९८४) संशोधित आवृत्तीने काढलेल्या श्लोकसंख्येशी तंतोतंत जुळली , तो श्लोक असा 

सप्त श्लोकसहस्त्राणि तथा नव शतानिच  ।
श्लोकाश्च चतुराशीति ग्रंथो दृब्द्धो  महात्मना ।।

यातील फक्त आदिपर्वातील एकूण श्लोकसंख्या ७९८४ एवढी सांगितली आहे तर निळकंठ प्रतीत ती ८८८४, कुंभकोणम (दक्षिण) प्रतीत १०८८९ एवढी होती. 

या सर्व अभ्यासासाठी BORI ला क्षेमेंद्र च्या भारतमंजिरी, देवबोध यांच्या ज्ञानदीपिका , अर्जुनमिश्र यांच्या भारतसंग्रहदीपिका , निळकंठ यांच्या भावार्थदीपिका, तसेच विमलबोध व सर्वज्ञ नारायण यांच्या ग्रंथ टिपांचाही बराच उपयोग झाला. 

BORI चे हे कार्य खरोखरच अवजड शिवधनुष्य पेलणारे महान कार्य होते व ते वर उल्लेखलेल्या संशोधकांबरोबरच तर अनेक संशोधकांनी ४ दशकांहून अधिक काळ अपार परिश्रम घेत पार पाडले. 

संदर्भ : (१) Prolegomena [to the critical edition of the Ādiparvan, Book 1 of the Mahābhārata].
(२) व्यासांचे शिल्प - प्रा. नरहर कुरुंदकर 
(३) युगांत - इरावती कर्वे 
(४) V. S. Sukthankar Memorial Edition, Vol. I: Critical Studies in the Mahābhārata




5 comments:

  1. फारच कठीण कार्य. तडीस नेले.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, यासाठी भांडारकरांच्या सर्व संशोधकांचे ऋण आपण मानलेच पाहिजेत. खरंच एक महान कार्य त्यांनी करून ठेवलाय आणि आजही चालूच आहे.

      Delete
  2. फारच कठीण कार्य. तडीस नेले.

    ReplyDelete
  3. फारच कठीण कार्य. तडीस नेले.

    ReplyDelete