महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Showing posts with label Killing of Jarasandh. Show all posts
Showing posts with label Killing of Jarasandh. Show all posts

Sunday, March 07, 2021

जरासंध वधाचे अप्रतिम शिल्प

 जरासंधाचा वध हि महाभारतातील अनेक राजकीय कंगोरे असणारी घटना. वरवर एक साधं द्वंद्वयुद्ध पण यात भीमाने केलेल्या जरासंधाच्या वधाने पांडवांसाठी व श्रीकृष्णासाठी अनेक गोष्टी प्रस्थापित केल्या.

खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची निर्मिती केल्यानंतर आपल्या वेगळ्या राज्याचा डंका पिटणे आवश्यक आहे हे पांडवांच्या व विशेषतः युधिष्ठिराच्या लक्षात आले व यासाठी राजसूय यज्ञ करावा असे त्याच्या मनात आले. अर्जुनाने मधल्या काळात विविध शस्त्रास्त्रांची प्राप्ती करून घेतली होतीच. त्यामुळे स्वतःच्या बंधूंच्या पराक्रमावर युधिष्ठिराचा विश्वास होताच. यासाठी त्याने पांडवांचा मित्र व सखा श्रीकृष्णाला हा विचार बोलून दाखवला आणि त्यालाही तो विचार पटला. पण यात मुख्य अडसर होता तो मगध सम्राट जरासंधाचा. पांडवांबरोबर कृष्णही हे जाणून होता कारण याच जरासंधाच्या १७ आक्रमणांमुळे यादवांना मथुरा सोडून दूर पश्चिमेला द्वारका बेटावर पळून जावे लागले. अशा जरासंधाला पराभूत केल्याशिवाय पांडवांचे सार्वभौमत्व देखील सिद्ध होऊ शकणार नव्हते आणि सेनाबळावर मगधावर आक्रमण करून जरासंधाला जिंकणे केवळ अशक्य होते. मानवी स्वभावाचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या श्रीकृष्णाने मग यावर वेगळी तोड काढायचे ठरवले, ते म्हणजे जरासंधाला त्याच्याच शब्दात या गुर्मीत बेसावध पकडून त्याला भीमाशी द्वंद्वयुद्ध खेळायला भाग पाडायचे व हा विचार त्याने पांडवांपाशी प्रकट करत आपली योजना त्याने त्यांच्यासमोर मांडली.

या योजनेनुसार स्वतः श्रीकृष्ण, अर्जुन व बलशाली भीम हे तिघेच जण ब्राम्हणवेषात जरासंधाच्या मगधात जाऊन जरासंधाला दान मागणार होते.स्वतःला क्षत्रिय शिरोमणी समजणारा जरासंध मग या मागणीला निश्चितच भुलणार होता.बलदंड जरासंधाशी युद्ध करण्यासाठी साजेशी शरीरयष्टी केवळ भीमाकडेअसल्याने तो भीमालाच आपला प्रतिस्पर्धी मानणार होता व हीच संधी शेवटी भीमाला साधायची होती.

कृष्णाच्या योजनेप्रमाणे तो भीम वअर्जुनासह मगधात पोहचला.जरासंधाला भेटून द्वंद्वाचे दान मागताच त्याच्या लक्षात आले कि हे ब्राम्हण नसून क्षत्रिय आहेत.त्यांची शरीरयष्टी पाहून ते कोण असावेत हेदेखील त्याच्या लक्षात आले व तरीदेखील आपल्या सामर्थ्याचा अभिमान बाळगणाऱ्या जरासंधाने हे आव्हान स्वीकारले आणि सर्वसाधारण शरीरयष्टी असणाऱ्या अर्जुन व कृष्णाला वगळून त्याने तुल्यबळ वाटणाऱ्या भीमाची या द्वंद्वासाठी निवड केली.

कित्येक दिवस चाललेल्या या द्वंद्वात तरुण भिमाचीही जरासंधाने दमछाक केलीच पण अखेरीस भीमाने त्याला जेरीस आणले.या द्वंद्वात जरासंधाचा मृत्यू होणार होता तो त्याच्या देहाची दोन शकले केल्यावरच व याचं कारण होत ते जरासंधाची अतर्क्य जन्मकहाणी. दोन वेगवेगळ्या मातांच्या पोटी अर्ध्या भागात जन्मलेल्या या बालकाचे हे तुकडे टाकून देण्यात  आल्यावर “जरा” नावाच्या राक्षसिणीने ते “सांधून” त्यातून “जरासंध” हे एक बालक तयार झालं होत म्हणूनच त्याचा मृत्यूदेखील त्याच पद्धतीत होऊ शकत होता. भीमाला द्वंद्वायुद्धाच्या वेळी हे सूचित करताना श्रीकृष्णाने  एका काडीची दोन भेकलं करून बाजूला फेकली होती. अशा प्रकारे शकलं केलेला जरासंध मात्र पुन्हा जुळला गेला व म्हणून कृष्णाने पुन्हा काडीची भेकलं केली व ती विरुद्ध दिशेला फेकली.भीमाने मग पुन्हा डाव टाकला व जरासंधाला उभा चिरत त्याची शकलं विरुद्ध दिशेला फेकत त्याचा अंत केला.

कंबोडियाच्या Banteay Srey या मंदिरात जी अनेक अप्रतिम शिल्पे आहेत त्यातील खांडव वन दहनाच्या शिल्पाचा उल्लेख मी याआधीच्या लेखात केला होता.त्याच मंदिरात असलेलं जरासंधवधाच शिल्प देखील अप्रतिम आहे.यात भीमानं केलेली जरासंधाची दोन शकलं व्यवस्थितपणे दाखवलेली आहेत. महाभारतातील अनेक कथानकं भारताबाहेर पण किती खोलवर रुजली आहेत याचं हे द्योतक आहे. Banteay Srey हे मंदिर अशा अनेक शिल्पांनी सजलेलंआहे व म्हणूनच अंगकोर वाटचं मंदिर पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी Banteay Srey चं हे मंदिर निश्चितच चुकवू नये.