महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Showing posts with label Krishna. Show all posts
Showing posts with label Krishna. Show all posts

Sunday, March 07, 2021

जरासंध वधाचे अप्रतिम शिल्प

 जरासंधाचा वध हि महाभारतातील अनेक राजकीय कंगोरे असणारी घटना. वरवर एक साधं द्वंद्वयुद्ध पण यात भीमाने केलेल्या जरासंधाच्या वधाने पांडवांसाठी व श्रीकृष्णासाठी अनेक गोष्टी प्रस्थापित केल्या.

खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची निर्मिती केल्यानंतर आपल्या वेगळ्या राज्याचा डंका पिटणे आवश्यक आहे हे पांडवांच्या व विशेषतः युधिष्ठिराच्या लक्षात आले व यासाठी राजसूय यज्ञ करावा असे त्याच्या मनात आले. अर्जुनाने मधल्या काळात विविध शस्त्रास्त्रांची प्राप्ती करून घेतली होतीच. त्यामुळे स्वतःच्या बंधूंच्या पराक्रमावर युधिष्ठिराचा विश्वास होताच. यासाठी त्याने पांडवांचा मित्र व सखा श्रीकृष्णाला हा विचार बोलून दाखवला आणि त्यालाही तो विचार पटला. पण यात मुख्य अडसर होता तो मगध सम्राट जरासंधाचा. पांडवांबरोबर कृष्णही हे जाणून होता कारण याच जरासंधाच्या १७ आक्रमणांमुळे यादवांना मथुरा सोडून दूर पश्चिमेला द्वारका बेटावर पळून जावे लागले. अशा जरासंधाला पराभूत केल्याशिवाय पांडवांचे सार्वभौमत्व देखील सिद्ध होऊ शकणार नव्हते आणि सेनाबळावर मगधावर आक्रमण करून जरासंधाला जिंकणे केवळ अशक्य होते. मानवी स्वभावाचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या श्रीकृष्णाने मग यावर वेगळी तोड काढायचे ठरवले, ते म्हणजे जरासंधाला त्याच्याच शब्दात या गुर्मीत बेसावध पकडून त्याला भीमाशी द्वंद्वयुद्ध खेळायला भाग पाडायचे व हा विचार त्याने पांडवांपाशी प्रकट करत आपली योजना त्याने त्यांच्यासमोर मांडली.

या योजनेनुसार स्वतः श्रीकृष्ण, अर्जुन व बलशाली भीम हे तिघेच जण ब्राम्हणवेषात जरासंधाच्या मगधात जाऊन जरासंधाला दान मागणार होते.स्वतःला क्षत्रिय शिरोमणी समजणारा जरासंध मग या मागणीला निश्चितच भुलणार होता.बलदंड जरासंधाशी युद्ध करण्यासाठी साजेशी शरीरयष्टी केवळ भीमाकडेअसल्याने तो भीमालाच आपला प्रतिस्पर्धी मानणार होता व हीच संधी शेवटी भीमाला साधायची होती.

कृष्णाच्या योजनेप्रमाणे तो भीम वअर्जुनासह मगधात पोहचला.जरासंधाला भेटून द्वंद्वाचे दान मागताच त्याच्या लक्षात आले कि हे ब्राम्हण नसून क्षत्रिय आहेत.त्यांची शरीरयष्टी पाहून ते कोण असावेत हेदेखील त्याच्या लक्षात आले व तरीदेखील आपल्या सामर्थ्याचा अभिमान बाळगणाऱ्या जरासंधाने हे आव्हान स्वीकारले आणि सर्वसाधारण शरीरयष्टी असणाऱ्या अर्जुन व कृष्णाला वगळून त्याने तुल्यबळ वाटणाऱ्या भीमाची या द्वंद्वासाठी निवड केली.

कित्येक दिवस चाललेल्या या द्वंद्वात तरुण भिमाचीही जरासंधाने दमछाक केलीच पण अखेरीस भीमाने त्याला जेरीस आणले.या द्वंद्वात जरासंधाचा मृत्यू होणार होता तो त्याच्या देहाची दोन शकले केल्यावरच व याचं कारण होत ते जरासंधाची अतर्क्य जन्मकहाणी. दोन वेगवेगळ्या मातांच्या पोटी अर्ध्या भागात जन्मलेल्या या बालकाचे हे तुकडे टाकून देण्यात  आल्यावर “जरा” नावाच्या राक्षसिणीने ते “सांधून” त्यातून “जरासंध” हे एक बालक तयार झालं होत म्हणूनच त्याचा मृत्यूदेखील त्याच पद्धतीत होऊ शकत होता. भीमाला द्वंद्वायुद्धाच्या वेळी हे सूचित करताना श्रीकृष्णाने  एका काडीची दोन भेकलं करून बाजूला फेकली होती. अशा प्रकारे शकलं केलेला जरासंध मात्र पुन्हा जुळला गेला व म्हणून कृष्णाने पुन्हा काडीची भेकलं केली व ती विरुद्ध दिशेला फेकली.भीमाने मग पुन्हा डाव टाकला व जरासंधाला उभा चिरत त्याची शकलं विरुद्ध दिशेला फेकत त्याचा अंत केला.

कंबोडियाच्या Banteay Srey या मंदिरात जी अनेक अप्रतिम शिल्पे आहेत त्यातील खांडव वन दहनाच्या शिल्पाचा उल्लेख मी याआधीच्या लेखात केला होता.त्याच मंदिरात असलेलं जरासंधवधाच शिल्प देखील अप्रतिम आहे.यात भीमानं केलेली जरासंधाची दोन शकलं व्यवस्थितपणे दाखवलेली आहेत. महाभारतातील अनेक कथानकं भारताबाहेर पण किती खोलवर रुजली आहेत याचं हे द्योतक आहे. Banteay Srey हे मंदिर अशा अनेक शिल्पांनी सजलेलंआहे व म्हणूनच अंगकोर वाटचं मंदिर पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी Banteay Srey चं हे मंदिर निश्चितच चुकवू नये.

खांडववन दहनाचे सुंदर शिल्प

कृष्णार्जुनानी केलेले खांडव वनाचे दहन हि महाभारतातील एक उल्लेखनीय घटना असल्याचे मानावे लागते कारण वरवर अनेक घटनांपैकी एक असे वाटणारी हि घटना पांडवांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारी एक घटना ठरली

एका ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या अग्नीला  दिलेले वाचन पूर्ण करण्याकरिता म्हणून कृष्णार्जुनांनी खांडव वन जाळल्याचा उल्लेख महाभारतात येतो. पण केवळ हे वन जाळूनच ते स्वस्थ बसले नाहीत तर या वनात वास करणाऱ्या व या अग्नीच्या ज्वालांतून स्वतःला सोडवू पाहणाऱ्या नाग जमातीच्या लोकांचा त्यांनी संहार केला व याला काहीतरी विशिष्ट कारण असले पाहिजे. या आधीही हे वन जाळण्याचे  प्रयत्न अग्नीने केले होते नाग प्रमुख तक्षकाचा मित्र असलेल्या  इंद्राने आपल्या पर्जन्य वर्षावाने ते हणून पडले होते. यावेळी मात्र प्रत्यक्ष कृष्णार्जुनच युद्धात उतरल्याने इंद्राचे काही चालले नाही व खांडव वन अग्नीच्या भक्षस्थानी पडले तेदेखील आता प्राणी व नाग जमातीच्या लोकांसह.

या प्रसंगाचे दृष्य कंबोडियातील Banteay Srei या ठिकाणच्या मंदिरात असलेल्या एका गोपुराच्या शिखरावर कोरलेले आहे. सोबत जोडलेल्या छायाचित्रात आपल्याला ते पहाता येत ज्यात वरच्या बाजूला तीन मस्तके असलेल्या ऐरावत या हत्तीवर बसलेला इंद्र आपल्याला पर्जन्यवर्षाव करताना दिसतो तर याच्या दोन्ही बाजूला रथात उभे असलेलं कृष्ण आणि अर्जुन यांनी आपल्या शर वर्षावाने हा पाणलोट थांबविल्याचे आपल्याला दिसते. त्याखाली या ज्वाळांनी वेढलेल्या जंगलातून बाहेर  पडण्यासाठी धडपडणारे प्राणी व काही नाग जमातीचे लोक दिसतात. या सर्व होरपळणाऱ्या प्राण्यांच्या वर शर साकवाखाली आपल्या नाग जमातीचा चिन्ह असलेल्या नागाचे शिल्प दिसतं.

या अग्निसंहाराच्या वेळी खांडव वनातील नागांचा प्रमुख तक्षक वनात नव्हता म्हणून तो वाचला. त्याची बायको व काही मुलं मात्र यात मृत्युमुखी पडली व म्हणूनच नाग पांडवांचे वैरी झाले, पुढे महाभारत युद्धात पांडवांचा सूड घेण्यासाठी सर्व नाग जमाती कौरवांच्या बाजूने लढल्या.अर्जुनासाठी तर पुढे हे वैर अभिमन्यूचा  मुलगा परीक्षित याचा सर्पविषाने मृत्यू घडवून आणेपर्यंत गेलं. परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने मग नागांच्या नाशासाठी याज्ञ देखील केला.या सर्वांवरून या प्रसंगाची दाहकता  पुढच्या पिढ्यांपर्यंत कशी पसरत गेली हेआपल्या लक्षात येईल.

याचअग्निसंहारातून तक्षकाच्या घरी आश्रयास असलेला मय हा असुर शिल्पी बाहेर पडला.कृष्णार्जुनांनी त्याला जीवदान दिले व या उपकारांची परतफेड म्हणून त्याने पांडवांना इंद्रप्रस्थात भव्य मयसभा नावाचं भव्य सभागृह बांधून दिले

मोक्षदा एकादशी (गीता जयंती )

 #GeetaJayanti, #VaikuntaEkadashi, #GitaJayanti, #GitaJayanti2020, #vaikuntaekadasi2020

२०२० ची गीता जयंती २५ डिसेंबर रोजी साजरी झाली , त्यानिमित्ताने लिहिलेली गीतेच्या १८ अध्यायांची ही छोटीशी ओळख .

गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ असला तरी यात काय आहे याची माहिती आपल्यापैकी बरेच जणांना नसते. महाभारत युद्धाच्या सुरुवातीला समोर सगे सोयरे, आप्त बंधू यांना  रणमैदानात पाहिल्यावर अर्जुन भ्रमित झाला, त्याला हे युद्धच नको असे वाटू लागले व त्याला समजावून युद्धाला तयार करण्यासाठी श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवतगीता.   मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशीला हि सांगितली गेली असे मानून हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वैकुंठाची दारे उघडी असतात व या दिवशी मृत्यू आल्यास मोक्षप्राप्ती होते असे मानून या दिवसाला वैकुंठ एकादशी अथवा मोक्षदा एकादशी असेही म्हटले जाते. एकूण १८ अध्यायाच्या ७०० संस्कृत श्लोकांमध्ये गीता सांगितली गेली आहे.

अध्याय पहिला : अर्जुन विषाद योग - या अध्यायात अर्जुनाला आपले आप्त स्वकीय समोर पाहून त्यांच्याशी युद्ध  करायचे याबद्दल वाटणाऱ्या विषादाचे वर्णन आहे.

अध्याय  दुसरा : सांख्य योग

अध्याय तिसरा - कर्म योग

अध्याय चवथा - ज्ञानकर्म सन्यास  योग

अध्याय पाचवा - सन्यास योग

अध्याय सहावा - ध्यान योग

अध्याय सातवा  - ज्ञान विज्ञान योग 

अध्याय आठवा - अक्षरब्रम्ह योग

अध्याय नववा - राजविद्या राजगुह्य योग

अध्याय   दहावा - विभूती योग

अध्याय अकरावा - विश्वरूप दर्शन योग - याअध्यायात भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवले आहे.स्तिमित झालेला अर्जुन मग भगवंतांना त्यांच्या मूळ रूपात येण्याची विनंती करतो 

अध्याय बारावा - भक्ती योग - या अध्यायात भगवंतांनी आपल्याला कोणत्या प्रकारचे भक्त प्रिय  ते स्पष्ट केले आहे व  त्यानुसार अर्जुनाने  कसे वागले पाहिजे हे सांगितले आहे 

अध्याय तेरावा - क्षेत्र क्षेत्रज्ञविभाग योग 

अध्याय चौदावा - गुणत्रय विभाग योग 

अध्याय पंधरावा - पुरुषोत्तम योग

अध्याय सोळावा - दैवासुरसंपद विभाग योग

अध्याय सतरावा - श्रद्धात्रय विभाग योग

अध्याय अठरावा - मोक्ष सन्यास योग